Tuesday, June 11, 2024

नृसिंह स्तोत्र: चेतनेची उपासना व सचेतनातील अभेद

 मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

भक्तीची मजा अशी आहे, की एका उपास्य दैवताला खोलात खोल, सूक्ष्मात सूक्ष्म रूपांत भेटत गेलात, की कुठल्याही दैवताला तशीच गळामिठी मारता येते. भूगर्भातल्या एखाद्या प्रचंड जलाशयाला जसं कुठेही खोदलं तरी तेच पाणी लागतं, तसं कुठल्याही दैवताची उपासना आपल्याला त्याच भक्तीच्या जलाशयात घेऊन जातेमात्र भक्तीची मेख अशी आहे, की हे पाणी लागायला "खुद" मध्ये तेवढी "खुदाई" करायची तयारी हवी. फक्त वरवरचे पापुद्रे सोलले, तर कुठेही खोदलं, आणि कितीही ठिकाणी खोदलं, तरी काही उपयोग नाही.

माझी हिंदूधर्माची पहिली ओळख मारुतीपासून झाली. लहानपणी झोपताना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींतून हनुमान भेटला, आणि आयुष्यभराचा friend-philosopher-guide मिळाल्यासारखं वाटलं, ते आजतागायत तसंच वाटतं.

हिंदूधर्माच्या मूलतत्त्वांची ओळख करून घ्यायला हनुमानासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. मारुतीच्या उपासनेतूनच मला राम भेटला, शंकर भेटला, वराह-नरसिंहाची जोडगोळी भेटली. रामाच्या भेटीतून नवदुर्गांची ओळख झाली. शंकरावर विचार करता करता स्कंद म्हणजेच कार्तिकेयाशी ओळख झाली, सती-पार्वती-दक्षाची भेट झाली, गणपतीची गणेशोत्सवात झाली होती त्यापेक्षा खूप जास्त ओळख झाली. तिथून पुढे इंद्र-वरुण-अग्नी-वायू . वैदिक देवांची ओळख झाली, त्यातून अदिती-कश्यप भेटले, पंचमहाभूते भेटली.

या सगळ्या प्रवासात मारुती पाठिराखा म्हणून कायम सोबत होता. गडा-झाडांवर उड्या मारणारा, जोरात भुभु:कार करून ऋषीमुनी दैत्य-दानव दोघांनाही पिडणारा, "हुप् कार करोनी आकाशात उडणारा", चंचल तरीही स्थितप्रज्ञ, असा हा देव माझ्या मनात अगदी पहिल्यापासून घर करून राहिला आहे

हल्लीच्या जगात ADHD चं निदान करण्यात आलेल्या सर्व मुला-मुलींना "औषधे" देऊन गपगार करण्यापेक्षा त्यांची हनुमानाशी ओळख करून दिली तर सर्वांचंच बरं होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला खात्री आहे, की मी लहान असताना जर हे ADHD चं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, तर मला नक्कीच ADHD चा "रुग्ण" समजून त्यावर "उपचार" केले गेले असते. त्याऐवजी मला हनुमान भेटला, हे माझं सौभाग्य.


सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे

हनुमानाच्या चळवळेपणामागे खूप मोठा अर्थ आहे. एका जागी शांत बसून राहता येणं, हा गुण आहेच. पण म्हणजे कायम सगळ्यांनी शांतच बसून राहिलं पाहिजे, ही अपेक्षा धरणं मूर्खपणाचं आहे

अशा वृत्तीतून फोफावते, ती नम्रता नव्हे, तर अहंकार. शिकवण्यात रस नसलेल्या शिक्षकांना, मुलांचं संगोपन करण्यात रस नसलेल्या पालकांना, आणि सृजनशीलतेत रस नसलेल्या कारखानदारांना सुरळीत, एका रेषेत चालणारे गुलाम मिळावेत, यासाठी केलेली ही गलिच्छ धडपड आहे

ज्यांना शांत बसायचंय त्यांनी जरूर बसावं - "शांताकारं" हे तर विष्णुचं प्रमुख नाव आहे - पण शांत बसणे ही चळवळीचीच सुफळ संपूर्ण अवस्था आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे

चळवळ होत असताना ती जबरदस्तीने गप्प करणं, हे कुणी शांत बसलेला असताना त्याला धक्के मारून उठवण्याइतकंच त्रासदायी. कच्ची फळं तोडायला कष्ट घ्यावे लागतात. पिकलेली फळं मात्र अलगदपणे हातात येतात. तसंच, अंगभूत चळवळ पूर्णत्वाला गेली तरच लहानपणीच्या स्वैर, कुणाला जुमानणाऱ्या नारायण सूर्याजीपंत ठोसराचा मोठेपणी समर्थ रामदास होतो. शांत बसणं म्हणजे चळवळ जबरदस्तीने बंद करणं, ही समजूत अत्यंत घातक चुकीची आहे. जॉर्ज ऑर्वेल च्या "1984" या प्रसिद्ध दु:स्थापनदर्शी (dystopian) कादंबरीचा हाच तर गाभा आहे.

 

कदा तो जनी पाहतांही दिसेना, सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना

चळवळ जीवंतपणा दर्शवते. इंग्रजी भाषेतला "animal" हा अतिपरिचयादवज्ञा झालेला शब्द खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. या शब्दामधलं "anim" हे मूलरूप "animism" "animated" या शब्दांतही दिसतं. हिंदू तत्वज्ञानात सचेतन आणि अचेतन या ज्या अत्यंत महत्त्वाच्या संज्ञा आहेत, त्यातली "चेतना" हाच animal मधल्या "anim" या मूलरूपाचा अर्थ

पाश्चात्यांचा "anim" म्हणजेच हिंदूंची "चेतना". जे सचेतन आहे, ते "animated" आहे. स्वयंप्रेरणेने, सचेतनपणे वागणारे, ते "animal".

ज्या पुरातन ग्रीक आणि संस्कृत भाषेतील साधर्म्यामुळे "proto-indo-european" भाषेचा अभूतपूर्व शोध लागला, ते साधर्म्य या दोन संस्कृतींच्या धार्मिक पद्धतीतही आहे

ग्रीकांचं pantheon (देवगण) आणि वैदिक हिंदू देव-देवतांमध्ये कमालीचं साधर्म्य आढळतं, कारण या दोन्ही संस्कृती proto-indo-european संस्कृतीपासूनच उत्क्रांत झाल्या, आणि animism वर आधारित, म्हणजेच चेतनेपुढे नतमस्तक होणाऱ्या होत्या

ग्रीकांचा जसा झ्यूस आहे, तसाच आपला इंद्र आहे. त्यांचा जसा औरानोस (युरेनस) आहे, तसाच आपला वरूण आहे. त्यांची जशी गाएया, तशीच आपली भूदेवी. त्यांच्या पर्सियस, हेराक्लिस, थीसीयस, अकीलीस या "heroes" सारखेच आपले राम, कृष्ण, वामन, परशुराम हे "अवतारआहेत. स्थलकालपरत्वे या दोन धर्मांत फरक पडले आहेत, पण मुळातली जगाकडे पाहण्याची दृष्टी एकच.

आजच्या काळात पाश्चात्त्य जगात "animism" हा शब्द बहुतेक वेळा हेटाळणीच्या सुरातच बोलला जातो, कारण आधुनिक विज्ञानात, दिसणाऱ्या, मोजमाप करता येणाऱ्या चेतनेला स्थान नाही, त्यामुळे त्यावर आधारित संस्कृती परंपरेलाही तिथे स्थान नाही. हिंदुस्थानात सचेतन-अचेतन या संकल्पनांचं महत्त्व अजूनही टिकून आहे, पण पाश्चांत्त्यांचं अनुकरण करण्याच्या आपल्या (जबरदस्तीने लादल्या गेलेल्या) सवयीमुळे त्याचाही ऱ्हास होत चालला आहे.


तया निर्विकल्पासि कल्पीत जावे, परि संग सोडूनि सूखे रहावे

या चेतनेचं हिंदू नाव म्हणजेच विष्णूनाभिकमलात ब्रह्मदेवाला धारण केलेला, महादेव शंकरालाही वंदनीय ठरलेला हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांचे मूळ आहे

चेतनाधारित (animist) संस्कृतींचं वैशिष्ट्य हेच, की त्यांनी निरपेक्ष (objective) ज्ञानामागे लागता सारं जग संपूर्णत: सापेक्ष (subjective) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं, हा संपूर्ण मानवी दृष्टिकोन आहे तरी काय, हे शोधण्यावर भर दिलावरूण, इंद्र, अग्नि . निसर्गदैवतांचं तत्त्व आपण मानवी रूपकांतून उलगडलं. विष्णू, शंकर . सर्वव्यापक तत्वांना "नेति नेति" म्हणतानाही मानवी मनाला कळतील वळतील अशा नामरूपांनी संबोधलंनिरपेक्ष ज्ञान जर असलंच तरीही ते आपल्याला दिसणार मानवतेच्या चष्म्यातूनच, हे पक्कं ओळखून आपण मानवी संवेदना उंचावण्यावर भर दिला. सापेक्ष ज्ञानाची परिणतीच निरपेक्ष ज्ञानात होते, हा अनुभव घेतलेल्यांनी आपल्या वागण्यातूनच इतरांना ही वाट चोखाळायला उद्युक्त केलं. कुणालाही याची जबरदस्ती करावी लागली नाही.

आपली पुराणे देवांचं, म्हणजेच निसर्गतत्वांचं मानवीकरण करून गोष्टी सांगतात, कारण निरपेक्ष ज्ञान कमावण्यापेक्षा माणसाची वागणूक कशी सुधारता येईल, समाज बलवत्तर कसा ठेवता येईल, चांगलं आयुष्य कसं जगायचं हे सामान्यजनांना कसं सांगता येईल, यावर आपण भर दिला. सृष्टीची कोडी उलगडण्याऐवजी आपण "स्व" ची कोडी उलगडण्यावर भर दिला. "स्व" मध्ये सृष्टीसुद्धा येतेच, हा चेतनाधारित विचारधारांचा अतिशय महत्त्वाचा शोध आहे. 

याच्या उलट, चेतनेचं अस्तित्वच अमान्य करणारे पाश्चात्त्य विज्ञान षड्रिपूंच्या आहारी गेले. निरपेक्ष ज्ञानाच्या मागे पळताना हा पळणारा "मी" आहे तरी कोण, याचा शोध बाजूला राहिला. त्यांना हवं होतं निरपेक्ष ज्ञान, कारण सापेक्ष ज्ञानाचा गैरवापर करून हुकूमशाही चालवणाऱ्या धर्मसत्तांची (theocracy) त्यांना सवय होती. त्यामुळे चर्मेंद्रियांद्वारे आणि बुद्धिखलाद्वारे मिळणाऱ्या "निरपेक्ष" ज्ञानाला त्यांनी प्राधान्य देणं अगदी स्वाभाविक होतं. "मी" ला मूलभूत मानूनच पाश्चात्त्य विज्ञान अजूनही सृष्टीची कोडी उलगडायला पाहतं. Consciousness च्या पायरीवर आधुनिक विज्ञान गेली शंभरहून अधिक वर्षे अडकून राहिलेले आहेपण त्या consciousness चे गोडवे आपल्या वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच गायलेले आहेत

"मी" आणि "माझ्याभोवतीची सृष्टी" यांमध्ये स्पष्ट भेद केल्यामुळेपाश्चात्त्यांचा सगळा कारभार चालतो सत्तेच्या, "मी" ची सत्ता "माझ्याभोवतीच्या सृष्टीवर" प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातूनयाउलट, हा "मी" स्वार्थी आहे हे जाणून "स्व"चा शोध घेणारी चेतनाधारित हिंदू विचारसरणी सकल प्राणीमात्रांतच नाही तर सकल चराचरात केशवालाच पाहते. गाईला आपण आई मानतो, वानर हनुमानाचे साथीदार म्हणून त्यांच्या मर्कटलीला खपवून घेतो. इतकंच नव्हे तर कधीकधी आपल्याच माणसांचा जीव घेणाऱ्या वाघ-सिंहांनाही आपण देवतांची वाहनं म्हणून गौरवलं, आणि अस्वलांना जांबुवंताच्या रूपात राम आणि कृष्ण दोघांच्याही आयुष्यात गोवलं.


सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे

सर्व जीवांतल्या चेतनेचा विष्णू मूलाधार असल्यामुळे अधर्मनिर्दालन करण्यासाठी विष्णूला त्या त्या परिस्थितीला साजेसं कुठलंही रूप घेता येतं. विष्णूच्या अनेक अवतारांमध्ये मत्स्य, कूर्म . पूर्णतः प्राणी असलेलेही अवतार आहेत, वराह, नृसिंह, हयग्रीव . अंशतः प्राणी अंशत‍‌: मनुष्य असलेलेही अवतार आहेत, आणि वामन, परशुराम, राम, कृष्ण असे पूर्णत: मानव असलेलेही अवतार आहेत. फक्त चार मानवी अवतार जरी पाहिलेतर त्यांच्यामध्ये तात्त्विक नसला तरी भौतिक फरक खूप आहे, कारण त्या त्या वेळच्या परिस्थितीच्या अनुसार हे अवतार घेतलेले आहेत.

विष्णूच्या पहिल्या दोन, म्हणजे मत्स्य कूर्म अवतारात धर्मसंस्थापनेचा हेतू असला, तरी कुणा असुराला वा दैत्याला मारण्याचा हेतू नाही. त्यापुढचे दोन अवतार, म्हणजेच वराह नृसिंह अवतार, हे मात्र दोन विशिष्ट असुरांना ठार करण्यासाठीच घेतलेले आहेत.

ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मिळत नाही, हे पाहिल्यावर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन असुरबंधूंनी अमरत्वाच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाणारे वर मागितले. हिरण्याक्षाने मानव, पशु, देवांपासून अभय मागितले, तेव्हा विष्णूने ना पशू, ना मानव, ना देव अशा वराह अवतारात त्याचा वध केला. लहान भावाच्या मरणाने चवताळलेल्या हिरण्यकश्यपूने त्याच्याही पुढे जाऊन दिवसा वा रात्री, घरात वा घराबाहेर, जमिनीवर वा हवेत, अस्त्राने वा शस्त्राने, जिवंत अथवा मृत गोष्टींने, आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीने मरण येणार नाही, असा वर प्राप्त करून घेतला.

अप्रत्यक्षपणे हिरण्यकश्यपूच्या अहंकारानेच आवाहन केलेल्या पशु-मानव-संकर स्वयंभू नृसिंहाने स्तंभातून जन्म घेतला, आणि संधिकाली (दिवसा नाही, रात्री नाही), स्वतःच्या मांडीवर (जमिनीवर वा हवेत नाही), घराच्या उंबरठ्यावर (घरात नाही, घराबाहेरही नाही), स्वतःच्या नखांनी (जिवंत वस्तूनेही नाही, मृत वस्तूनेही नाही, शस्त्रास्त्रानेही नाही) हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला.


अनन्यास रक्षीतसे चापपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

अधर्माने कुठलंही रूप धारण केलं आणि कितीही शक्ती कमावली, तरी धर्माकडे त्याचं उत्तर असतं. मात्र कर्मठपणे कुठलातरी एकच पंथ पाळता, स्थलकालसुसंगत रूप घेण्याची लवचिकता अंगी बाणवायला हवी.

मारुतीच्या उपासनेमध्ये पंचमुखी मारुतीला विशेष महत्त्व आहे. या प्रतिमेतील हनुमान, नरसिंह, वराह, गरूड, आणि हयग्रीव हे पाच पशु-मानव संकर बाह्यरूपनिरपेक्ष चेतनेचेच प्रतीक आहेत. एकाच तत्त्वाची पाच उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपूसारख्या बलशाली, उन्मत्त दैत्याला लहान बाळासारखं मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचं पोट फाडणाऱ्या नरसिंहाबद्दल मला आधीपासून कुतूहल होतंच, पण पंचमुखी प्रतिमेमध्ये मारुतीच्या बरोबर नरसिंहाला पाहून एकदम मनात प्रकाश पडला, आणि मारुती-नरसिंहातला अभेद लक्षात येऊन नरसिंहाबद्दलची आपलेपणाची भावना आणखीनच दृढ झाली.

मनुष्य पशू यांना जगवणारी चेतना तीच आहे. फरक आहे तो फक्त देहरूपाचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या क्षमतांचा, बलाबलांचा. नरसिंहाची नखं रामाकडे नाहीत, तसेच रामाचे धनुष्यबाण मारुतीकडे नाहीत. कृष्णाचे सुदर्शनचक्र वराहाकडे नाही, तर मारुतीची लोहदंडासारखी शेपूट शंकराकडे नाही.

मूलरूप एकच आहे, आविष्कार अनेक आहेत.

प्रत्यक्ष अवतार, आणि जिवलग सख्यासारखे सेवक, असं पंचमुखी मारुतीच्या पाचही मुखांचं विष्णूशी, म्हणजेच चेतनेशी, "anim" शी, जवळचं नातं आहे. ही चेतना जागृत ठेवण्याची, आपल्या अंतरंगातील "खुदाई" कधीही थांबवण्याची आठवण शिकवण पंचमुखी मारुती आपल्याला देतो. 

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:

प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नम् चतुर्विधं" 

(भगवद्गीता १५:१४)

हे एकदा कळलं आणि वळलं, की खुद काय, खुदा काय, कोणीच ही खुदाई अडवू शकत नाही. भगवद्गीतेचा दहावा "विभूतियोग" अध्याय हेच सांगतो. या अध्यायातील अनेक श्लोक इथे नमूद करता येतील, पण लांबण लावायला नको म्हणून मनाला आवर घालतो आहे. जिज्ञासूंनी गीतेचा दहावा अध्याय जरूर वाचावा.

याच विचारातून सुचलेलं हे नृसिंहस्तोत्र इथे post करीत आहे:

नृसिंह स्तोत्र

 

अनन्तसुखदं अमूर्तमूर्तं
द्वन्द्वातीतं भक्तरक्षकं
उत्तमोन्नतं धर्माधारं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
भीषणरूपं विश्वाधारं
करालदन्तं गूढविरूपं
अनिकेतं अमलं अविभक्तं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
मातुरंकयोर्शिशुमिव शमनं
तथा विष्णुना हिरण्यदमनं
अविनाशिं अजमाविर्भूतं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अनरं अपशुं अनस्त्रशस्त्रं
अकालस्थानम् अमृत्युजन्मं
नखाग्रशस्त्रं दैत्यकन्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अजं स्वयंभुं अयोनिजन्मं
मदान्धदैत्त्यं हतमविरोधं
भक्तरक्षणं दुष्टमर्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
विश्वविनायक रामं विरजं
अनिरुद्धं भय-तृष्णा-शमलं
अद्भुतरूपं अद्भुतदेहं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||


महद्रूप नृसिंह भगवान की जय!


- तन्मय विराज टिकेकर

११ / ०६ / २०२४

Sunday, June 02, 2024

निधर्मवाद: हिंदुत्व, धर्म, आणि अधर्म

Secularism म्हणजे काय यावर थोडासा विचार करण्याची गरज आज आलेली आहे. याला राजकीय कारणं तर आहेतच, ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची सामाजिक व वैयक्तिक / मानसशास्त्रीय कारणंही आहेत. 

Secularism ची विचारधारा अस्तित्त्वात आली धर्माच्या नावाखाली स्वार्थ साधणार्या मध्यस्थांच्या विरोधात. पण म्हणून निधर्मीवाद धर्माच्याच विरुद्ध आहे असे मानण्याची काहीच गरज नाही. धर्म म्हणजे काय, हेच न कळल्याचे हे लक्षण आहे. निधर्मीवादाच्या नावाखाली राजकारण करणार्यांना मदत होते, ती प्रजेच्या धर्म, अधर्म, आणि निधर्म या बाबतीतल्या अज्ञानाची. हे अज्ञान जमेल तेवढं पुसण्याचा हा एक प्रयत्न.  

भारतात सध्या जो धर्माच्या नावाखाली अधर्माचा आणि निधर्माचा धुमाकुळ चाललाय, ती केवळ पाश्चात्त्य देशांत घडून गेलेल्या स्थित्यंतराची पुनरावृत्ती आहे. याला भारताने विरोध करायचा झाला, तर तो भारतीय पद्धतीनेच करायला हवा. हे पाश्चात्त्य पद्धतींचे काम नोहे. 

Secularism चा पाठ शिवाजी महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच आपल्याला घालून दिलेला आहे. ज्या शिवाजीने सूरत लुटताना ख्रिस्ती धर्मप्रचारकांना हातही लावला नाही, त्याच शिवाजीने त्याच धर्माच्या इंग्रजांच्या वखारी मुळापासून साफ केल्या, याचा अर्थ आजच्या "निधर्मी" लोकांना समजणार नाही. ज्या इस्लामचा गर्व बाळगणाऱ्या सुलतानांशी महाराज आयुष्यभर लढले, तोच इस्लाम पाळणाऱ्या "बाबा याकूत" नावाच्या सद्गृहस्थांचा आशीर्वाद घ्यायला महाराज गेले होते, हे आजच्या "निधर्मी" लोकांना अतर्क्य वाटेल. दाभोळ शहर इस्लामी राजवटीतून मुक्त करण्याच्या मोहिमेच्या आधी महाराज बाबा याकूत ना भेटायला गेले होते, आणि या पीराने त्यांना या मोहिमेसाठी आशीर्वादही दिला, हे ऐकून तर आजच्या निधर्म्यांची बोटंच तोंडात जातील. 

औरंगझेबापासून आदिलशाह पर्यंत सर्व मुस्लिम सुलतान जेव्हा आपल्या कारभारात मुस्लिमांना प्राधान्य देत होते, त्या काळात महाराज आपलं आरमार एका मुस्लिम सरदाराच्या हातात सोडत होते, आणि सुरतेतल्या मुस्लिम व्यापार्यांची संपत्ती लुटतानाही त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका राहणार नाही, याची (शक्यतोवर) काळजी घेत होते. 

आजच्या निधर्म्यांना महाराजांना "निधर्मी राजा" म्हणून गौरवायला आवडतं, पण महाराजांच्या या निधर्मीपणाला हिंदूधर्माची शिकवण कारणीभूत होती, हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. 

धर्म-जात न पाहता केवळ अन्यायावर तुटून पडण्याची ही शिकवण हिंदूधर्मातूनच महाराजांना मिळाली. "ब्राह्मण" असलेल्या रावणाला धर्मसंस्थापनेसाठी जमीनदोस्त करणार्या, आणि त्याला ठार केल्यावर "वैर मरणापर्यंत असतं, त्यापुढे नाही" असे म्हणून आदराने रावणाचे अंत्यसंस्कार करण्यार्या श्रीरामाची शिकवण महाराजांना होती, म्हणूनच ते केवळ महापराक्रमी विजेता न होता "जाणता राजा" झाले, "शिवकल्याण राजा" झाले. 

श्रीरामाच्याही आधी, माणसाचा जन्म, पंथ, वा समाजातील स्थान न पाहता त्याच्या कर्मानुसार त्याची पारख करायची हिंदूधर्मात फार मोठी परंपरा आहे. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला येऊनही त्याला विष्णूने नृसिंहरूपात वाचवलं हे आपल्याला माहिती असेल, पण त्याला ज्याच्यापासून वाचवलं, तो हिरण्यकश्यपूही ब्रह्मदेवाच्या वरदानामुळेच देवांना वरताण झाला होता, हा तपशील आपण विसरतो. शिवाने वरदान दिलेल्या भस्मासुराला विष्णूने मोहिनीरूपात ठार केलं (करवलं), आणि ब्रह्मदेवानी वरदान दिलेल्या त्रिपुरासुराला शिवाने, तर महिषासुराला दुर्गेने ठार केलं. 

वरदान देणारेही हिंदू देवच, आणि वरदान मिळालेल्यांचा वध करणारेही हिंदू देवच. असं कसं?? 

याचं उत्तर अत्यंत सोपं आहे: हे सर्व असुर जेव्हा वरदान मागायला तपश्चर्या करत होते, तेव्हा देव त्यांना "असुर" म्हणून पाहतच नव्हते मुळी. तेव्हा ते होते फक्त भक्त. याचक. त्यांचं कर्म जेव्हा अन्यायाकडे झुकायला लागलं, त्यांच्या वरांचा ते जेव्हा गैरवापर करू लागले, तेव्हा त्यांना ठार मारण्याशिवाय देवांकडे पर्याय उरला नाही. प्रश्न व्यक्तीचा नव्हताच मुळी. प्रश्न होता कर्तृत्वाचा. 

फक्त दैत्य-दानव-राक्षसांचीच उदाहरणे तरी कशाला द्यायची? खुद्द देवनायक इंद्राने तरी काय कमी व्यभिचार केला? कमी अन्याय केला? इंद्र अहिल्येच्या रूपाला भुलून तिला फसवण्यासाठी गौतमाचं रूप घेऊन आला, आणि अहिल्या त्याला फसली. याबद्दल गौतमानी अहिल्येला दगड बनवलं एवढी गोष्ट आपल्याला माहिती असेल, पण गौतमानी इंद्राला त्याच्या अपराधाबद्दल केलेली शिक्षा तर त्याहून किळसवाणी व भीतीदायक आहे. जिज्ञासूंनी स्वतः शोध घेऊन ती जाणून घ्यावी. 

धर्म-जात-जन्मावर नव्हे, तर फक्त आणि फक्त कर्मावर माणसाची पारख करण्याची इतकी मोठी परंपरा असलेल्या देशाला सेक्यूलरिझ्म इतरांनी शिकवण्याची काहीच आवश्यकता नाही. 

सेक्यूलरिझ्मच्या नावाखाली आज विशिष्ट जाती-जमातींना राजकीय पाठिंबा दिला जातो हे दुर्दैव आहेच, पण खरा प्रश्न त्याहीपेक्षा खोलातला आहे. 

खरं म्हणजे "secularism" म्हणजे केवळ पूर्वापार चालत आलेल्या जीवनपद्धतीला दिलेला नकार आहे. आपण आयुष्य सेक्यूलरपणे व्यतीत करतो, म्हणजे काय रे बाबा? असं कुणा आधुनिक सेक्यूलराला विचारलं, तर त्याला खरं म्हणजे काहीच उत्तर देता येणार नाही. फार फार तर "कुठल्याही विशिष्ट धर्माला मी प्राधान्य देत नाही" ही पुस्तकी व्याख्या त्याला सांगता येईल, पण आपण काय करत नाही, यावर आयुष्य उभारता येत नाही. आयुष्य जे आहे त्याचा विचार करून उभं करावं लागतं, जे नाही त्याचा नाही. 

निधर्मीपणे जगणं हे liberal arts मध्ये डिग्री मिळवलेल्या वाचावीरांना वाटतं तितकं सोपं नाही. मुळात धर्म म्हणजे काहीतरी जुनाट, प्रतिगामी, त्याचा "आत्ताच्या जगाशी" काही संबंधच नाही, ही समजूतच चुकीची आहे.

फक्त चुकीची नाही, तर घातक आहे, कारण "आपण निधर्मी आहोत" या समजुतीने आपला "आत्ताच्या जगातला" खरा धर्म झाकून ठेवायला मदत होते. 

स्वार्थीपणा, ऐदीपणा, अहंकारी वृत्ती, थोडक्यात सांगायचं तर हिंदू तत्वज्ञानात वर्णन केलेल्या षड्रिपूंवर आजचा समाजधर्म आधारलेला आहे. हिंदू तत्त्वज्ञानात राम, हनुमान, शंकर इ. पौरुषत्वाचे, आणि दुर्गा, पार्वती, सीता इ. स्त्रीत्वाचे आदर्श मानले जातात. आजच्या समाजधर्मात मात्र बलोन्मत्त रावण आणि मर्यादाहीन शूर्पणखा हे पौरूषत्व आणि स्त्रीत्वाचे आदर्श झाले आहेत. 

आपल्याला हवे ते आपण घ्यावे, बाकीचं ज्याचं तो बघून घेईल, ही वृत्ती मनुष्यात आधीपासून आहेच. फरक एवढाच, की पुरातन धर्मपद्धतींनी या वृत्तीतली कुरूपता पाहून "लहानपण देगा देवा" म्हटलं, आणि या नैसर्गिक पण कुरूप प्रवृत्तींपासून दूर कसं राहता येईल, याचा विचार केला, आणि आजच्या विज्ञानाधारित "शहाण्या" मानवतेने या पूर्वजांना मूर्ख ठरवून स्वत‌:ला भौतिकतेच्या, म्हणजेच षड्रिपूंच्या हवाली केले. आपल्या पूर्वजांनी षड्रिपूंचं दमन आणि नियमन करण्यात धन्यता मानली, तर आपण इंद्रीयसुखांच्या मागे लागून स्वरूपालाच नव्हे तर स्वरूपाच्या संकल्पनेलाही विसरून बसलो. आपल्या मनात येणारे विचार, प्रकट होणाऱ्या इच्छा म्हणजेच आपण, हा गैरसमज दृढ झाल्यामुळे, या मनोमय कोषामागचा विज्ञानमयकोषही आपण विसरून बसलो, तर त्याहीमागच्या आनंदमयकोषाची तर गोष्ट दूरच राहिली. 

आपल्या इच्छा पुर्या करून घेणे, हाच जिथे धर्म, तिथे या पुरातन विचारधारांना थारा मिळणार असा? "विज्ञान" भौतिक जगात कैद झाल्यामुळे आपल्या मनाच्या पलीकडेही काही आहे, हे म्हणणारेच वेडे ठरले. शहाणे ठरले ते मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारे, इच्छांचा मागोवा घेण्याऐवजी इच्छांच्या मागोमाग जाणारे. 

संस्कृत भाषेने धर्माची "धारयते इति धर्म:" अशी मोठी सुंदर व्याख्या केलेली आहे. जो धरून ठेवतो, एकत्र बांधून ठेवतो, तो धर्म. ज्या सूत्राच्या आधारावर एखादी गोष्ट उभी असते, तो त्याचा धर्म. एखाद्या गोष्टीचं जे तत्त्व, तो त्याचा धर्म. 

या अर्थाने पाहिलं, तर धर्म नाही, अशा खर्या अर्थाने "निधर्मी" असं या जगात काहीच नाही. कुणीच नाही. असूच शकत नाही.

माणसांचं पाहिलं, तर ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो (सुख नव्हे, आनंद) तो आपला धर्म, अशी ढोबळ व्याख्या आपण करू शकतो. यात सर्व मनुष्यजातीला लागू पडणार्या काही गोष्टी आहेत, व आपापल्या स्वभावानुसार आपल्याला लागू पडणार्याही काही गोष्टी आहेत. एखाद्या गायकाला जो आनंद एखादी सुंदर सुरांची लकेर घेताना होतो, तोच आनंद एखाद्या फुटबॉलपटूला एखादा सुरेख "गोल" मारल्यावर होतो. अगदी तोच आनंद - त्यात डावं-उजवं काहीही नाही. पण त्याच गायकाला फुटबॉल च्या मैदानात उतरवलं, किंवा खेळाडूला मैफिलीत गायला लावलं, तर दोघांचेही हातपाय कापायला लागतील. 

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: 
(भगवद्गीता ३:३५)

अख्ख्या गीतेचं सार म्हणता येईल असा हा श्लोक हेच सांगतो. 

सगळ्यांची आपापली वाट आहे. सगळ्यांचा आपापला धर्म आहे. याचा हिंदू, ख्रिस्ती, ज्यू, मुस्लिम वगैरै संघटित "धर्मांशी" काहीही संबंध नाही. हा सर्वस्वी ज्याचा त्याचा, आपला-आपला मामला आहे. 

मात्र झालंय असं, की हा "स्वधर्म" शोधायची वाटच आधुनिक विज्ञानाने बंद करून टाकलेली आहे. इतरांना सिद्ध करून दाखवता येईल, पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवता येईल, तेच खरं, या संकुचित प्रवृत्तीनी ही वाट कशी चालता येईल? ही वाट चालायला कळप-वृत्ती सोडायला लागते. दुसरा म्हणतो, अनेक लोकं म्हणतात ते खरं ही समज सोडावी लागते. आपल्याला कशातून आनंद मिळतो, कशातून समाधान मिळतं, हे दुसरा कुणीही आपल्याला कसं सांगू शकेल? दुसर्याला आनंद देणारी गोष्ट आपल्याला आनंद देईल कशावरून? आईच्या पोटात नऊ महिने एकत्र वाढलेल्या जुळ्या भावंडांत सुद्धा एकाला जे आवडतं ते दुसर्याला आवडेलच असं सांगता येत नाही, तर करोडोंच्या जनसमुदायाला एकच गोष्ट कशी आवडू शकेल? शक्यच नाही ते. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण थोडंफार कमावलं असेलही, पण जे गमावलं ते त्यापेक्षा कैक पटीनी जास्ती आहे. जे सुदृढ असतं ते धार्मिक असतं. जे आपल्या पायांवर उभं असतं ते धार्मिक असतं. तान्हं बाळ रांगायला आणि त्यानंतर चालायला लागतं, कारण तो त्याचा धर्म आहे. २ वर्षं झाली तरी बाळ चालायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. आपलं आपण बोलायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. याला वैद्यकीय भाषेत काहीही म्हणोत, पण त्या बाळाला धरून ठेवणारं सूत्र हवं तसं काम करत नाही, हाच त्याचा अर्थ. जे धार्मिक आहे, त्याची त्याच्या स्वरूपाशी नाळ घट्ट बांधलेली असते. जे धार्मिक असतं, ते स्वरूपाधिष्ठित असतं. आणि हिंदू परंपरेत स्वरूपाधिष्ठित असण्यापेक्षा उजवं काहीच नाही. 

रामरक्षेत रामाला उद्देशून 
"काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं" 
अशी एक ओळ आहे. इथे रामाला पूजापाठ करताना दाखवायचा हेतू नसून, त्याची स्वरूपाधिष्ठितता दाखवायचा हेतू आहे. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण आपली सुदृढता गमावून बसतो आहोत, स्वरूपाधिष्ठितता गमावून बसतो आहोत. याला आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय उपाय म्हणजे रामाला केवळ मंदिरात नाही, केवळ अयोध्येत नाही, तर मना-मनात आणून बसवणं. रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान करणं. 

3 Idiots मधला रॅंचो म्हणतो, "Excellence का पीछा करो. Success झक मारके तुम्हारे पीछे आएगी". 

रामायणातला राम आणि चंदेरी पडद्यावरचा रॅंचो यांची ही तुलना थोडी विनोदी वाटली, तरी excellence च्या मागे धावणं हेच रामाच्या सत्य स्वरूपाचं खरं ध्यान आहे. प्रत्येक कृतीत उत्तमतेच्या मागे धावणं, म्हणजेच रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान. 3 Idiots मधला रॅंचो खरं म्हणजे गरीब घरातून, कठीण परिस्थितीतून पुढे आलेला असतो. पण त्याचा उत्तमतेचा ध्यासच त्याला त्याच्या गंतव्यस्थानी घेऊन जातो (आणि करीना कपूर बरोबर त्याची जोडी पण जुळवून आणतो). नाईलाज म्हणून केलेल्या नामघोषा ऐवजी हा उत्तमतेचा रामघोष जर भारताच्या घरा-घरांत घुमायला लागला, तर भारत राजकीय महासत्ता व अध्यात्मिक विश्वगुरू व्हायला असा कितीसा वेळ लागेल!

- तन्मय विराज टिकेकर
२ जून २०२४